बुधवार, ३१ जुलै, २०१९

ज्ञानेश्वरीतील अमृत वेचे ...२_१



                      कुळहरणीं पातकें 


जरी वधु करूनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी ॥२२८॥

कुळहरणीं पातकें । तियें आंगीं जडती अशेखें । तयें वेळी तूं कवणें कें । देखावासी ॥२२९॥

जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ॥२३०॥

सकर्दम सरोवरू । अवलोकुनि चकोरू । न सेवितु अव्हेरू । करूनि निघे ॥२३१॥

तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा । जरी पुण्याचा बोलावा । नाशिजैल ॥२३२॥

अर्थ : (अर्जुन म्हणाला कृष्णाला -)

          जर मी नातलगांचा वध केला, तर सर्व दोष मला लागतील आणि तुझी सोबत हातची जाईल. कुळाच्या घाताने मला पातकें लागतील,  तेव्हा मी तुला कुठे पाहावे ?
            ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तिथे क्षणभरही थांबत नाही; चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर त्याचा त्याग करून निघुन जातो; त्याप्रमाणे हे देवा, जर माझे पुण्य संपले तर तू माझ्याकडे येणार नाहीस.


                     (श्री. दांडेकर महाराज संपादित वरून)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा