गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

ज्ञानेश्वरीतील अमृत वेचे ...४_२


                चैतन्य आणि प्रपंच 



    आतां अर्जुना आणिक कांहीं एक । सांगेन मी आईक । जें विचारें  परलोक । वोळखिती ॥१२५॥
    या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वात । तें तत्वज्ञ संत । स्विकारिती ॥१२६॥
     सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥१२७॥
      कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥१२८॥
       ना तरी जाणिवेचिया आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥१२९॥
        कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥१३०॥
        तसैं विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्वता तत्व उरलें । ज्ञानियांसी
॥१३१॥
        म्हणोनि अनित्याचां ठायीं । तया आस्तिक्यबुद्धि नाही । निष्कर्ष दोहींही । देखिला असे ॥१३२॥


अर्थ : 

           आता अर्जुना, तुला मी आणखी एक गोष्ट सांगतो, ऐक. ज्ञानी पुरूष वस्तुस्वरूप विचाराने जाणतात. या देहात , जगात सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे, हे तत्व जाणणारे संत त्याचा स्वीकार  करतात.
           दुध पाण्यात एकरूप होऊन मिसळून गेले असते. राजहंस निवडून ते वेगळे करतो ; किंवा हुशार लोक अग्नीच्या सहाय्याने हिणकस धातू वेगळा करून केवळ शुद्ध सोने निवडतात. किंवा दही घुसळले असता लोणी वेगळे दिसते. किंवा एकत्र असलेले भूस आणि धान्य उफणले असता धान्य राहते आणि फोलकट उडून जाते, असे जाणवते.
            तसा विचार केला असता, प्रपंच मिथ्या आहे, असे ज्ञानी पुरूषांना जाणवते; ते प्रपंच सोडतात. त्यांच्या ठिकाणी एकच तत्व चैतन्य  उरते. देह, प्रपंच अशाश्वत आहेत आणि चैतन्य नित्य आहे, असा निष्कर्ष निघतो.
            


 (सार्थ ज्ञानेश्वरी, श्री. दांडेकर महाराज संपादित, वरून)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा